सोमवार, २२ जून, २०१५

गालगुच्चा


"तुझ्या कविता ऐकायला येतेय", असा 
तुझा निरोप आला कि मला हसूच यायचं
कारण तुझा आणि कवितेचा बादरायण संबंध नाही
हे मला ठाऊक होत
यायचीस आणि म्हणायचीस,
"चल  वही वगैरे काढून ठेव, तोवर मी भजी करायला घेते"
सारी तयारी बरोबर घेऊन आलेली असायचीस तू.
मी मनापासून वाचायचो कविता तुझ्यासाठी
एका पाठोपाठ एक …
मधून मधून भजी आणि वाफाळलेली कॉफी
तू मधून मधून दाद द्यायचीस
"वा ", " काय कल्पना आहे, पुन्हा वाच" …
"काय समजल ग तुला ह्या कवितेतल ?"
मी विचारल होत एकदा
तर म्हणालीस, "तू समजलास, तेव्हढी समज खूप झाली"
.
.
निरोपाच्या वेळी कवितांची वही तुला देऊ केली
तर म्हणालीस, "नको, कवितांचा गालगुच्चा नाही घेता येत !"
त्या नंतर त्या वहीतल्या कविता वाचल्या नाहीत,
 कधीच, कुठेही
कांद्याच्या भज्यांनाही कवितेची चव आली नाही कधी !!
- श्रीधर जहागिरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा