शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

चारोळ्या

1.
थेंब थेंब साचत साचत
झाला कधीच डोह,
ठिणगी ठिणगी पेटत पेटत,
हुंकारे विद्रोह !!

2.
ओसरल्या आज किनारी
काळाच्या लाटा,
शोधत बसते मन बावरे
ओळखीच्या वाटा!

3.
आलोच आहे अवनीवर
तर ऋतू साहणे आले,
मैफिलीत सामील झालो,
म्हणून गाणे आले!

4,
जो क्षण जगावासा वाटतो 
तोच नेमका क्षणिक असतो,
उरल्या सुरल्या बाकींना 
जीवनभर स्मरीत  बसतो! 

5,
जो तो जपत असतो 
आपापली आवड,
सारेच उचलत नसतात 
आईबापाची कावड!

6.
मी एक झाड पाहिले,
शब्दांनी रसरसलेले ,
मातीतून उगुनी आठवणींच्या,
आकाशा भिडलेले ..

7.
ओसंडूनी न वाहतात 
आसवे काळजात थिजतात,
जिथे मैत्र जुळले तिथे  
आज कारस्थाने शिजतात ....

8.
प्राजक्ताचा गंधही येथे, 
पुरला माझ्या श्वासाला,  
कांचनाचा स्पर्श तोकडा 
भासे कुठल्या कायेला!

9.
देण्यासाठी हात केला, 
ओंजळ माझी होती रिती,
घेण्यासाठी हात किती, 
सारे जीव घायगुती!

10.
कशासाठी जगायचे,
हे होते उलगडले,
कुणासाठी जगायचे, 
तेथे सारे अवघडले!

11.
मोलाचे क्षण जगण्याचे
अफूत गेले,
भरजरी आयुष्य सुखाचे
रफूत गेले...

----श्रीधर जहागिरदार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा