रविवार, ८ एप्रिल, २०१२

प्रश्न पडायलाच हवेत...


प्रश्न  पडायलाच हवेत...
कोण? कां? कुठे? कसे?

अरे उद्गारून तर बघ 
ते प्रश्न ..
जे कुरतडून काढतात,
तुझे पाय,
अन खिळून राहतोस तू,
आंत घोंघावणाऱ्या 
वादळांचे भोवरे सोसत,
उसासत....

हे असे असतेच  कुणी 
तुझ्या प्रश्नांसाठी उत्तरे
उरात घेऊन  जन्मलेले...

तो बघ कुणी ,
अविरत प्रेम वर्षाव करतोय...
खिळ्यांचे प्राक्तन सोसून
आपणच वाहून आणलेल्या 
क्रुसावर लटकावला गेला तरी.... 

शोध आपली उत्तरे त्याच्या 
ठिबकत्या रक्तातून....

आणि तो तथागत,
तथाकथित ऐश्वर्याचे 
माजोरी मोह भिरकावून 
शोधीत फिरला
अटळनिय दु:खाचे मूळ,
अन निवारण...
मग वाटत राहिला 
ज्ञान बोध, हर एक
शरणागताला...

शोध आपली उत्तरे 
एकदा तरी
चाकोरीतून निघून,
नव्या वाटेवर...

प्रश्न पडायला हवे...
प्रश्न पडायलाच हवेत..
सुरुवात तरी कशी होणार अन्यथा 
तुझ्या प्रवासाला? 


- श्रीधर जहागिरदार
८.०४.२०१२ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा