सोमवार १८ मार्च २०१३

कातरवाट

परीट घडीच्या मनावरती
कातरवेळची काजळी
सांदी कोपरी दडून बसले
आठव जुने वटवाघुळी … 


हिंदकळणारी, फडफडणारी
अजस्त्रपंखी कर्कशा
लक्तर लक्तर पिंजून निघते
भावनांची दुर्दशा  …

रंगीत क्षितीजापलीकडे
अंधाराचा हा घसा
इवला इवला होऊन जाई
भेदरलेला शुभ्र ससा  ….


आकांताने रोज चुकावी
त्रिशंकूची कातरवाट  … 
नवी क्षितिजे घेऊन येईल
कुणी सांगावे नवी पहाट  !

 - श्रीधर जहागिरदार
(१९७०) 

सोमवार ४ मार्च २०१३

आभाळ

आभाळ इथपासून तिथपर्यंत
एका खिडकीत मावत नाही,
ज्याला त्याला वाटत असत:
आपल्या खिडकीतल तेवढच सच्च !
आपली खिडकी सोडत नाही,
दुसऱ्या खिडकीत जात नाही …

खिडकी असते भिंतींमध्ये
भिंत उभी मनामध्ये 
मन वसते माणसामध्ये
माणस सारी घरामध्ये 
घराभोवती पुन्हा भिंती
भिंतीमध्ये असते खिडकी
खिडकी मधला आभाळ तुकडा
तुकडा म्हणजे आभाळ नाही


आभाळाच्या गोष्टी करायला
'तुझ माझ' सोडून, अख्ख्या
आभाळाला भिडायला हवं
भिंती मोडून किंवा घर सोडून
सरळ आभाळाखाली यायला हवं

येशील?



- श्रीधर जहागिरदार
५-३-२०१३

माणसांची हद्द झाली

माणसांची हद्द झाली
धर्म ही सरहद्द झाली …

घेउनी  मुख्त्यारनामा
बघ खुदा ही खुद्द झाली ...

स्वार्थ तो चलनात येता
प्रेम नाणी बद्द झाली …

तख्तपोशी मान्य होता
दोष कलमे रद्द झाली …

झोडता चौकात 'श्री'ला
खूष ती बेहद्द झाली …




- श्रीधर जहागिरदार
४-३ -२०१३

शनिवार ९ फेब्रुवारी २०१३

एक्झिट

राखेमधूनी पहाल नक्की
होईल पक्षी बहाल नक्की...
 
वाटेत काटे सजावटीला,
तूझाच आहे महाल नक्की ...

देशोधडीला सुखास लावा
तेंव्हा खुषीने रहाल नक्की...
 
भेटून येता लगेच बाधा !
ओठांमधूनी जहाल नक्की ...

तुम्हास भासे "उद्या सुखाची"
दु:खे अजूनी सहाल नक्की...

विषाक्त गंगा, विषाद नाही
कुंभास तेथे नहाल नक्की...

एक्झिट होता विदूषकाचे
डोळ्यात अश्रू वहाल नक्की ...

"श्री" तू जरीही प्रयास केला
निसटून गेला खयाल नक्की...



- श्रीधर जहागिरदार
१०-०२-२०१३

मंगळवार ५ फेब्रुवारी २०१३

कां गुन्हे अभिमान झाले...


घात झाले, प्रतिघात झाले,
सांत्वनाचे आघात झाले....

भास झाले, आभास झाले
स्पष्ट होता उपहास झाले...

भिन्न झाले, कभिन्न झाले
टिपुर जेव्हां खिन्न झाले....

क्षुब्ध झाले, प्रक्षुब्ध झाले
लोळ उठता हतबुद्ध झाले ....

मान झाले, सन्मान झाले,
कां गुन्हे अभिमान झाले...

-श्रीधर जहागिरदार
१२-०१-२०१३

पाऊस ..


अचानक भरून आलं ..
अचानक भरून आलं आकाश ...

मी ऐकत बसलो होतो तलत, त्या संध्याकाळी..
हृदय पिळवटून काढणारे शब्द
"है सबसे मधुर वो गीत..."

तू उठलीस आणि ...
निघूनच गेलीस ...

पाऊस घनघोर ....
वस्तीला आलेला तुझ्या डोळ्यांत...

परतलीस आणि झटक्यात बंद केलेस तू गाणे

पण, हा पाऊस? त्याच काय?
तो बंद करण जमेल तुला?

- श्रीधर जहागिरदार
जाने २०१३

गुरुवार ३१ जानेवारी २०१३

चाहूल

(दोन वर्षापूर्वी लिहिलेली एक कविता, गझल स्वरुपात पुनर्लेखीत केली आहे)



गेलास टाळुनी ते , माझेच दार होते,
दोस्तीत वागणे हे, नक्कीच फार होते!

चाहूल लागली अन मैफल जमून आली
ती रात्र पेलण्याला, पेले तयार होते!

जो तो उतावळासा "फोडेन मीच वार्ता"
मोजून आणलेले खांदेहि चार होते!

आधीच फोडलेले टाहो अधीर त्यांनी,
ज्यांच्या कडून माझे येणे उधार होते!

पश्चात 'ऊब' ज्यांना, त्यांना उगाच वाटे
हातात हात याचे कधिचेच गार होते !

गेलास तू वळूनी, मारून फक्त टिचकी 
झाले निराश
ज्यांचे सुकण्यात हार होते!

भेटीस आपल्या ह्या अटकाव खूप झाला 
"श्री" हे  तुझ्या मनाचे भलते प्रचार होते !

- श्रीधर जहागिरदार
३१-०१-२०१३